Additional information
| बांधणी | Paperback |
|---|---|
| ISBN | 978-93-93134-69-1 |
| edition | पहिली आवृत्ती. ऑगस्ट २०२५ |
Original price was: ₹325.00.₹260.00Current price is: ₹260.00.
ग्रामीण जीवन ज्या शेतीच्या आश्रयाने उभे असते त्या शेतीशी निगडित किती तरी प्रश्न आज ऐरणीवर आले आहेत. सध्याच्या काळात समाजजीवनात कधी नव्हे एवढी अस्वस्थता पसरली आहे. गरीब-श्रीमंत दरी वाढत चालली आहे. देश महासत्ता होणार, असा प्रचार सर्वत्र चाललेला असताना देशाच्या सर्वच प्रांतांमध्ये कष्टकरी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी प्रचंड खळबळ माजवून दिली आहे. त्यापासून आजचा लेखक अलिप्त राहू शकत नाही. उलट त्याच्यावर अधिक जबाबदारी येऊन पडते. अशोक कौतिक कोळी यांच्यासारखे ग्रामीण समाजस्तरातून पुढे आलेले लेखक अत्यंत सजगतेने ही जबाबदारी पार पाडताना दिसतात.
जागतिकीकरण, वाढते शहरीकरण, दारिद्र्य, बेकारी, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा व त्यातून उद्भवणारे आत्महत्यांचे सत्र यांसारख्या प्रश्नांची प्रत्यक्ष आंच लागलेल्या, कृषक समाजातून पुढे आलेल्या या लेखकाच्या लेखनाला स्वानुभवाचा मूलाधार आहे. त्यामुळेच त्यांचे लेखन अस्सल, कसदार झालेले आहे. खेड्यातील राजकारण, दुष्काळ, ताणे-बाणे, हेवेदावे, द्वेष-मत्सर, सावकारी इत्यादी अनेक वृत्ती-प्रवृत्तींमध्ये जखडलेला आणि पिचून निघालेला शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेकार तरुण, अन्यायाने चिरडल्या जाणाऱ्या स्त्रिया यांच्या प्रश्नांचे अनेक स्तर या कथांमधून समोर येत राहतात. शेतकऱ्यांच्या शोषणाची नवनवी तंत्रे कशी विकसित केली जात आहेत याचे प्रभावी दर्शन ही कथा घडविते आणि हे तंत्र हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांना लढायलाही शिकविते.
नव्वदोत्तरी-आजच्या जागतिकीकरणाच्या गतिमान युगात ग्रामजीवनात किती उलथापालथ होत आहे, हे पाहून पुढे कोणती संकटे वाढून ठेवलेली आहेत, याचे सूचन ही कथा करते. कलावंताला आवश्यक भविष्यवेधी दृष्टी येथे प्रकट होते.
आपल्याच परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण बोलीतून झालेले जीवनानुभव आणि त्याचा आविष्कार यांचे एकात्म रसायन अशोक कौतिक कोळी यांच्या कविता, कथा, कादंबरी लेखनातून निर्माण झालेले दिसते. सहज आणि उत्कट आविष्कारामुळे या संग्रहातील कथांना अनघड असा स्वाभाविक अकृत्रिम घाट लाभलेला आहे.
| बांधणी | Paperback |
|---|---|
| ISBN | 978-93-93134-69-1 |
| edition | पहिली आवृत्ती. ऑगस्ट २०२५ |
Reviews
There are no reviews yet.