Additional information
| लेखक | अरुण काळे |
|---|---|
| पृष्ठसंख्या | 98 |
| बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
समकालीन मराठी कवितेची सगळी समीक्षक-सुलभ वर्गीकरणं ओलांडून नंतर आलेले लोक या संग्रहातली अरुण काळे यांची कविता मूल्यभान आणि स्वच्छ दृष्टी यांच्या बळावर ठामपणे उभी राहते. इतिहास आणि समकाल यांच्या संदर्भात सामान्य माणसाचे जगणे हे त्यांच्या कवितेचे प्रमुख आशयसूत्र आहे. निसर्गाच्या सान्निध्यात साधेबाधे जगून स्वत:ची संस्कृती निर्माण करू इच्छिणाऱ्या मूळच्या लोकांना नंतर आलेल्या लोकांनी न्यूनत्व दिले. आपली सत्ता कायम केली. त्यांना दीन, दलित व दुबळे केले. त्यांच्या वाट्याला नामुष्कीचे जिणे येईल असे अनुरूप तत्त्वज्ञान प्रसृत केले. ह्या युगानुयुगीच्या आंतरिक वसाहतवादाचा मूळच्या लोकांनी भोगलेला हा इतिहास आहे. ही मध्ययुगीन आवरासावर कोण करेल ? या रास्त सवालाचे उत्तर शोधेपर्यंत समकाल आपल्या संहारक शक्ती बरोबर घेऊन राक्षसी पावलांनी आक्रमण करतो आहे. भ्रामक वास्तवांचे इंद्रजाल विणतो आहे. संवेदनशीलतेने जगणे केवळ अशक्यप्राय होत असलेला सचिंत नागरिक हा अरुण काळे यांच्या कवितेचा नायक आहे. तो हरघडी नाउमेद होईल अशी परिस्थिती आहे. संघर्षात अपयश येणे, मूल्यहीन जगणे, इतिहासात पराभूत होणे या गोष्टी माणसाच्या मर्यादा स्पष्ट करतात. तत्त्वच्युती मानवी वास्तव आहे. परंतु तत्त्वविस्मृती माणसाचे माणूसपण हिरावून घेणारा भोवरा आहे. म्हणून ती अक्षम्य ठरते. समकालात तत्त्वविस्मृतीचा धोका अरुण काळे यांच्या कवितेला तीव्रपणे जाणवतो..
हा एक द्वितीयांश ग्लास दूध पिऊन / दहा किलो दप्तर वाहणारा माझा मुलगा / ही चळवळीला दुरावलेली / रक्तदाब जडलेली माझी बायको / ह्या म्हाताऱ्या आईची करता येत नाही कपभर देखभाल ह्या ओळींतले कुटुंब कवींचे, कवितेतल्या नायकाचे, तुमचे माझे किंवा आपणा सर्वांचे आहे. अरुण काळे यांच्या कवितेला एवढी व्यापकता सहजपणे लाभलेली आहे. त्यांनी ती समकालीन बोलीचे प्रवाहीपण आपलेसे करून मिळविली आहे. समकालीन मराठी कविता प्रगल्भ झाल्याची ग्वाही देत अरुण काळे सामान्य माणसाच्या बिकट जगण्याचे व्याकूळ चिन्हशास्त्र समर्थपणे मांडतात.
– रवीन्द्र किंबहुने
| लेखक | अरुण काळे |
|---|---|
| पृष्ठसंख्या | 98 |
| बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.